- मा. श्री लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, अ. भा. म. सा. स., यांची टीवीवरील मुलाखत.
मा. श्री लक्ष्मीकांत देशमुख यांची काल टीवीवरील मुलाखत पाहिली. खूप अप्रूप वाटले. परभणी येथे आमचे सर असताना त्यांचा सहवास लाभला. त्यांचा निःस्पृह स्वभाव, कामाप्रती आग्रही वृत्ती, त्यांचे व्यक्तिमत्व, लिखाण इ. बाबींचा अनुभव मिळाला. त्यांची दोन नाटके, "दीपशिखा" आणि "अखेरची रात्र" मध्ये मला भूमिका करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच.
सरांना साहित्य क्षेत्राची आवड होती आणि आहे. त्यांच्यामुळेच ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इ. स. १९९५मध्ये आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन इ. स. २००० मध्ये परभणी येथे होऊ शकले. परभणीसारख्या अविकसित जिल्ह्याच्याठिकाणी ही संमेलने होऊ शकली; ती सरांमुळेच. या दोन्ही संमेलनाला अभूतपूर्व गर्दी झाली होती. साहित्यप्रेमी आणि प्रेक्षक यांनी मंडप हाऊसफुल्ल झाल्यामुळे मंडपाच्या बाहेर उभेराहून संमेलनांचा आनंद घेतला होता. पुस्तकांच्या स्टाँलवर पुस्तकांची विक्रमी विक्री झाली होती.
सरांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे, परभणीचे सुपुत्र आणि प्रख्यात साहित्यिक आणि कवी बी. रघुनाथ यांचे स्मारक अस्तित्वात आले. बी. रघुनाथ सभागृह/नाट्यगृह, साहित्य प्रदर्शनासाठी हॉल आणि बी. रघुनाथ यांचा देखणा पुतळा सरांमुळेच उभा राहू शकला. सरांचे हे कार्य परभणीकर कधीच विसरू शकणार नाहीत.
९१व्या अ. भा. म. सा. सं. चे अध्यक्ष म्हणून सरांचे कार्य अलौकिक राहणार यात शंका नाही. मला साहित्याचा थोडा अनुभव आल्यानंतर आणि माझी तीन पुस्तके; १]" जीवन संघर्ष" {आत्मचरित्र}, [२] "भूलई" { कथा संग्रह} आणि [३] "आठवणींचा पिंगा" { व्यक्तिचित्रें आणि कथा संग्रह} प्रकाशित झाल्यानंतर असे वाटते, कीं; सरांच्या मुलाखतीत उल्लेख झाल्याप्रमाणे खालीलप्रमाणे गोष्टी व्हाव्यात.
१] मतदारांची संख्या वाढावी. त्यासाठी साहित्य परिषदेने मतदार नोंदणीसाठी पेपरमध्ये जाहिरात द्यावी. मतदार होण्यासाठीच्या अटीं नमूद कराव्यात; तसेच फी अत्यल्प ठेवावी.
२] सरांनी म्हटल्याप्रमाणे, बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी मराठी विषय आवश्यक करावा; म्हणजे मराठी भाषेचे महत्व वाढेल. सध्या पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल जास्त आहे; तो कमी होऊन मराठीकडे वाढवा ही अपेक्षा. मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थीसुद्धा डॉक्टर, इंजिनिअर आणि महत्वाच्या पदावर जाऊ शकतात; हे पालकांनी ध्यानी घ्यावे. शिवाय प्रत्येक मराठी माणसाने लक्षपूर्वक मराठीतूनच बोलावे आणि लिहावे. मराठी भाषेची भेसळ करू नये.
३] महत्वाचे म्हणजे, इतर भाषेतील साहित्यापेक्षा मराठी साहित्याच्या किमती भरमसाठ आहेत. सामान्य माणसाला असे साहित्य विकत घेणे इच्छाअसूनही परवडत नाही. इंग्रजी, हिंदी साहित्याच्या किमती कमी असतात; त्याप्रमाणेच मराठी साहित्याच्या किमती कमी झाल्यातर आपसूकच मराठी वाचकही वाढतील आणि मराठीला बरे दिवस येतील.
लक्ष्मीकांत देशमुख सरांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ते अनेक कामे करतील यात काही शंका नाही. त्यांनी सनदी अधिकारी म्हणून काम केलेले असल्यामुळे त्यांचा शासनदरबारी चांगला वट आहे; त्यामुळे अद्याप न झालेली कामेही होऊ शकतील.
शेवटी, सर अध्यक्षपदी निवडून आले म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीस मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा.
...